नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : सत्यातील असत्यता ५

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

सत्यातील असत्यता ४   सत्यातील असत्यता ६

 "भद्रचे बोलणे खरे ठरले. एके दिवशी माझ्याकडून विक्षर मारला गेला. त्या दिवसापर्यंत मी त्याच्यापासून त्याची स्वतःची ओळख लपवत आलो होतो. तो कोण होता? याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही, इतका मोठा घात झाला होता माझ्याबरोबर."

"त्या दिवसापर्यंत मला देखील सत्य माहित नव्हते. मी समजत होतो की, नागराज संपला आहे. पण ते पूर्ण सत्य नव्हते. त्याच्या मृत्यूपश्चात आपल्या कर्मगतीनुसार भोग भोगून झाल्यावर, त्याने स्वेच्छेने आपल्या मागील जन्मातील अपूर्ण राहिल्येल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला होता. तोच हा... माझा मुलगा विक्षर. ही गोष्ट मला त्याच्या जन्मापासूनच माहित होती. परंतु हा नागराजचा पुनर्जन्म असल्याने त्याला ह्या जन्मात आपल्या पूर्वजन्माबद्दल काहीच माहित नव्हते. आणि ते त्याला कधीही माहिती पडूच शकले नसते, परंतु ज्याप्रमाणे ही गोष्ट मला माहिती होती, त्याचप्रमाणे ती भद्रला म्हणजेच पूर्वजन्मातील नागऋषींना देखील माहिती पडली होती. परंतु ह्या जन्मात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या अलौकिक शक्ती नसल्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत माझा सामना करू शकले नसते. म्हणूनच त्यांनी तंत्र विद्येच्या आणि वेताळाच्या सहाय्याने मला आणि विक्षरला त्या रात्री स्मशानात आणले जेणेकरून विक्षरला माझी आणि पर्यायाने स्वतःची देखील ओळख पटली असती. परंतु त्यावेळी तसे काहीही घडले नसले, तरी माझ्या अलौकिक शक्ती पाहिल्यानंतर विक्षरच्या मनातही अशाप्रकारच्या शक्ती प्राप्त करण्याची लालसा निर्माण झाली होती. नव्हे ती त्या भद्रने निर्माण केली होती. त्या दिवशी मला अचानक माझ्या काकींचा फोन आला आणि त्यांच्याकडून संदीपकाका शेवटच्या घटका मोजत असल्याचे कळल्याने मी काही वेळेसाठी का होईना चिंतीत झालो. स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेलो. त्यामुळेच माझे विक्षर आणि भद्रच्या भेटीकडे दुर्लक्ष झाले. ज्याप्रमाणे मी विक्षर आणि भद्रवर लक्ष ठेवून त्यांची भेट होण्याचे टाळत होतो, त्याचप्रमाणे भद्र माझी नजर चुकवून विक्षरची भेट घेण्याच्या प्रयत्नात होता. आणि दुर्दैवाने त्याला तशी संधीही मिळाली. त्या दिवशीच्या भेटीत, भद्रने विक्षरला आपल्या पूर्वजन्माची कथा ऐकवली होती. तेव्हापासूनच तो मला आपला शत्रु समजू लागला होता. त्या दिवसापासूनच त्याच्या मनातील आपल्या विक्षररुपाची जागा नागराजने घेतली. हा नागराजचा दुसरा जन्म होता. म्हणजेच त्या दिवसापासून नागराजने विक्षरच्या मनात आपले अस्तित्व निर्माण केले. त्याच्या मनातील हा नागराज दिवसेंदिवस अधिकच महात्वाकांक्षी होऊ लागला होता. आणि एक दिवस तो इतका महत्वाकांक्षी झाला की, त्याला मला संपवून माझी जागा घ्यावीशी वाटली. तेच त्याच्या मृत्यूचे कारण होते."

"विक्षरचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या दिवशी मी ध्यानधारणा करत होतो. ध्यानधारणा करत असताना मी त्यात इतका बुडालो होतो की,, मला माझीच शुद्ध राहिली नव्हती. मी अशा अवस्थेत असताना, विक्षरने एका धारधार शस्राने माझ्या मस्तकावर वार केला. साहजिकच त्याला माझा नागमणी प्राप्त करायचा होता. दुर्दैवाने ते शक्य नव्हते. त्याने त्या शस्त्राने माझ्यावर वार करताच मी जरी ध्यानात लीन असलो, तरी माझा नागमणी जागृत झाला. त्याचा परिणाम स्वरुप जागृत नागमणीच्या शक्तीने विक्षरने माझ्यावर केलेला वार त्याच्यावर परावर्तीत झाला. परिणामस्वरूप त्याच्या मेंदूला मोठी जखम होऊन त्याचा मृत्यू झाला."
. . .