नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : भूतकाळातील घटनाक्रम २

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

भूतकाळातील घटनाक्रम १   तिच्या स्मृती १

धनंजय आपल्या बाजूने प्रकाशविरुद्ध लढण्यास का तयार नाही? यामागचे कारण तांत्रिक भद्रला कळल्यापासून तो फारच अस्वस्थ झाला होता. प्रकाश पृथ्वीवरच्या काळानुसार दर आठवड्याला एका मनुष्याचा बळी देण्यास इतक्या सहजतेने कसा काय तयार झाला असावा? 'ते सुद्धा फक्त धनंजयला पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याकरिता!' त्याने जर मनात आणले असते तर त्याच क्षणी धनंजयलाही यमसदनी पोहोचवू शकला असता, मग त्याने ही तडजोड कशासाठी केली असावी? त्यामागे अजून काही कारण असावे का? अशाप्रकारचे कित्येक प्रश्न भद्रच्या अस्वस्थेमागचे कारण होते.

प्रकाशच्या या निर्णयामागे नक्कीच काहीतरी दुसरे महत्वाचे कारण असणार यावर भद्रचा ठाम विश्वस होता. म्हणूनच त्याने पुन्हा एकदा या गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचे ठरविले. कित्येक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांच्यासमोर त्यावेळी नागलोकात घडलेल्या प्रसंगाचे चित्र स्पष्ट होऊ शकले होते.

ज्यावेळी धनंजयने प्रकाशकडे अशा प्रकारचे विचित्र वचन मागितले, त्या वेळी त्याच्या मनात धनंजयला नकार देण्याचा किंवा वेळप्रसंगी धनंजयशी युद्ध करून त्याला संपवण्याचा विचार सुरु झाला होता. पण त्याच वेळी हिमालयातील गुप्त ठिकाणी विविध लोकातील जीवांबरोबर वास्तव्य करणाऱ्या प्रत्यूष स्वामींनी प्रकाशचे मार्गदर्शन करण्याकरीता मनोमन त्याच्याशी संपर्क साधला होता.

"प्रकाश धनंजयचे वचन मान्य कर. लक्षात ठेव, तुझा मूळ उद्देश वाईट प्रवृत्तींचा अंत करणे हाच असला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने ती वेळ आली आहे. ज्याची आम्ही तुला प्रशिक्षण देताना पूर्वकल्पना दिली होती, आता तुला पृथ्वीलोक आणि नागलोक यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करायचे आहे. कारण तू मनुष्य आणि नाग या दोघांचेही मिश्र रूप आहेस. तेव्हा आम्ही काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक."

"पृथ्वीवरील मनुष्याची स्थिती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे वाईट प्रवृतींची दिवसेंदिवस वाढ होत असून चांगली प्रवृत्ती नष्ट होत आहे. त्यामुळे मनुष्य एकमेकांवर व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील इतर जीवांवरही अन्याय अत्याचार करू लागला आहे. आपल्या शुल्लक स्वार्थी प्रवृत्तीपुढे आंधळा झालेल्या मनुष्याला सत्कर्माची जाण आणि आपल्या दुष्कार्माचे भान राहिलेले नाही.  यामागे मुख्य कारण म्हणजे देवतांनी, मनुष्याच्या जीवनात हस्तक्षेप करणे पूर्णपणे थांबवले आहे आणि असे घडावे ही देखील कधी काळी मनुष्याची इच्छा होती. म्हणूनच आता देवतांनी पृथ्वीवर जन्म घेतलेल्या मनुष्याचा मृत्यू होईपर्यंत त्याचे संपूर्ण जीवन त्याच्याच हाती सोपवले. परंतु त्याच्या मृत्युनंतर त्याच्या कर्मानुसार त्याच्या आत्म्याची पुढील गती निश्चित करण्याचे कार्य मात्र त्यांनी आपल्याच हाती ठेवले आहे. अशाप्रकारे मनुष्याच्या पृथ्वीवरील जीवनातून देवतांनी आपले अंग काढून घेतल्याने कलियुगातील मनुष्याची स्थिती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत चालली आहे. म्हणूनच आता देवतांनी पुन्हा मनुष्याच्या जीवनात लक्ष घालून वेळप्रसंगी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपाने हस्तक्षेप करून मनुष्याची स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात तुझा देखील सहभाग असणार आहे. होय, देवतांनी तुझ्याकडे न्यायदानाचे कार्य सोपवले आहे, जो नीच प्रवृतीचा मनुष्य वारंवार संधी मिळून सुद्धा सुधारणार नाही, अशा मनुष्याला मृत्युदंड देण्याचा तुला अधिकार असणार आहे. त्यामुळे धनंजयला दररोज एका मनुष्याचा बळी कसा द्यायचा? ह्या गोष्टीची चिंता करणे तू आता सोडून दे आणि निश्चिंत होऊन धनंजयला दर दिवशी एका मनुष्याचा बळी देण्याचे वचन दे."

प्रत्यूष स्वामींनी अशा प्रकारे प्रकाशशी साधलेल्या संवादानंतरच प्रकाश धनंजयला हवे असलेले वचन देण्यास तयार झाल्याचे भद्रच्या लक्षात आले होते.
. . .