नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : अपहरण १

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

पार्श्वभूमी   अपहरण २

प्रकाश ऑफिसमधून नुकताच बाहेर पडला होता. आणि पावसाला सुरुवात झाली. तसा दिवसभरात अधून मधून चांगलाच पाऊस पडला होता. सकाळी घाईगडबडीत निघाल्यामुळे आज तो छत्री सोबत आणायला विसरला होता. पावसाची पर्वा न करता त्याने रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. दिवसभराच्या पावसामुळे आणि त्यामुळे झालेल्या रेल्वे गाड्यांमधील तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे बरेच प्रवासी स्टेशनवर गाड्यांची वाट बघत ताटकळत उभे होते. साहजिकच स्टेशनवर माणसांची खूप गर्दी झाली होती. स्टेशनवर पोहोचेपर्यंत प्रकाशचे संपूर्ण कपडे पावसामध्ये भिजले होते. पावसामुळे सर्वत्र वातावरण एकदम थंड झाले होते. प्रकाशला हवेतल्या गारव्यामुळे थोडी थंडी जाणवू लागली होती. त्यामुळे त्याच्या मनात सिगारेट ओढण्याची इच्छा निर्माण झाली. रेल्वे स्थानकाबाहेरच एक पानवाला आहे, हे त्याला माहीत होते. आणि तसेही ट्रेन काही लवकर येत नाही या विचाराने तो सिगारेट घेण्यासाठी त्या दुकानाच्या दिशेने पावले टाकत चालू लागला.

सिगारेटचे झुरके घेत तो पुन्हा रेल्वेच्या फलाटावर पोहोचला. ट्रेन अजुनही आली नव्हती पण लोकांची गर्दी अधिकच वाढली होती. त्या स्थानकावरील  चहा विक्रेत्यांकडून त्याने चहा घेतला. तितक्यात ट्रेन आली. ट्रेन मध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी खूप असल्यामुळे त्याने त्या ट्रेनमध्ये न चढण्याचा निर्णय घेतला आणि तो आरामात चहा घेत घेत सिगारेट ओढत दुसरी ट्रेन येण्याची वाट बघत बसला.

बराच वेळ झाला तरी दुसरी ट्रेन अजुनही आली नव्हती. ट्रेनची वाट बघून बघून त्याला फार कंटाळा आला होता. पहिली ट्रेन न पकडण्याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला होता. थोड्या वेळाने त्याला लांबून ट्रेन येताना दिसली तसा तो ट्रेन पकडण्यासाठी थोडा सावध झाला. ‘काहीही झाले तरी ही ट्रेन सोडायची नाही’ या विचाराने तो गर्दीतून मार्ग काढत पुढे-पुढे चालू लागला, आणि कसाबसा ट्रेनच्या डब्यामध्ये आत शिरण्यात यशस्वी झाला.

पुढील मार्ग मोकळा नसल्याने ट्रेन मध्ये-मध्ये बराच वेळ थांबत होती. त्यामुळे रोज एका तासात पोहोचणाऱ्या ट्रेनला आज त्याच ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन तास लागले. ट्रेनमधील कमी न होणारी गर्दी आणि सतत मध्ये मध्ये थांबणारी ट्रेन यामुळे आधीच तो खूप कंटाळला होता. त्यामुळे त्याचे स्थानक येताच, क्षणाचाही विलंब न करता  तो लगबगीने ट्रेनमधुन उतरला.

स्टेशन परिसरात पावसामुळे भरपूर चिखल साचला होता. सर्वत्र पाणी तुंबले होते. पाऊस आता थोडा कमी झाला होता. पण अजूनही पूर्णपणे बंद झाला नव्हता. प्रकाशच्या अंगावरील कपडे आता सुकत आले होते. त्यामुळे त्याला परत भिजत घरी जाणे जीवावर आले होते.

रोजच्या वेळेपेक्षा आज घरी जायला त्याला थोडा उशीर झाला होता. तसे रेल्वे स्थानकापासून त्याचे घर जवळच होते. त्यामुळे तो रोज स्थानकापासून घरापर्यंत चालतच जात असे. आजवर ऑफिसमधून घरी परतताना, कधी रिक्षाने घरी आल्याचे त्याला आठवतही नव्हते. पण आज मात्र त्याला रस्त्यावरच्या चिखलातून चालण्याचा खूप कंटाळा आला होता, आणि तसाही दिवसभरच्या कामाने आणि मग रेल्वेच्या रेंगाळवाण्या प्रवासाने तो खूप थकला होता.

तो रिक्षात बसला, रिक्षाचालकाने रिक्षाचा मीटर फिरवला आणि रिक्षा सुरु केली. तितक्याच अचानकच रिक्षात ती आली आणि प्रकाशच्या बाजूला येऊन बसली. प्रकाशने तिचे लक्ष नसताना गुपचूप एक नजर तिच्याकडे टाकली. आज नेहमीपेक्षा जरा जास्तच सुंदर दिसत होती ती. या आधीसुद्धा कितीतरी वेळा त्याने तिला बघितलेले होते. पण ती कोण आहे? याचा पत्ता मात्र त्याला अद्याप नव्हता. बऱ्याचदा ती अशीच अचानकपणे त्याच्यासमोर येत असे आणि अशीच अचानकपणे निघूनही जात असे. आज पुन्हा एकदा तिला आपल्याजवळ पाहून प्रकाश काहीसा विचारमग्न झाला होता. तितक्यात रिक्षा त्याच्या इमारतीखाली पोहोचली. प्रकाश रिक्षातून उतरला. पॅन्टीच्या मागच्या खिशातील पाकीट काढण्यासाठी त्याने हात मागे केला. तसे, त्याच्या खिशात पाकीट नसल्याचे त्याला जाणवले. तरीही तो पुन्हा पुन्हा पाकीट तपासू लागला. त्याने त्याच्या बॅगेतही तपासून बघितले, पण त्यातही त्याचे पाकीट नव्हते. पाकीट चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तसे रिक्षाचालकाला सांगितले, पण रिक्षाचालकाचा त्यावर विश्वास बसेना. तो प्रकाशवर भडकला. “इ सब बहाने हम पहले भी बोहोत बार सुन चुके है, तुम लोग साला कभी नही सुधरोगे...” असे बरेच काही तो प्रकाशला बोलू लागला. मी दोन मिनिटात वर जाऊन पैसे आणून देतो.” असे तो त्या रिक्षाचालकाला सांगू लागला. पण तो रिक्षाचालक काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने प्रकाशला शिव्या द्यायला सुरु केले तसे प्रकाशचेही डोके फिरले. आतापर्यंत त्याने त्या रिक्षाचालकाची समजूत काढण्याचा भरपूर प्रयत्न केला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. तो रिक्षाचालक फारच विक्षिप्त होता. तो प्रकाशचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. “हम भी उपर आते है” असे म्हणून तो सुद्धा प्रकाशबरोबर गेला.

प्रकाश घरी आला. त्याने त्या रिक्षाचालकाला त्याच्या घराबाहेर थांबण्यास सांगितले आणि लगेचच घरातून पैसे आणून त्या रिक्षाचालकाला दिले. पैसे घेतल्यावरही तो काहीतरी बडबडतच होता. प्रकाशने त्याच्याकडे लक्ष न देता घरचा दरवाजा लावून घेतला. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या घरची बेल वाजवली. प्रकाश दरवाजाजवळ उभा होता, त्यामुळे त्याने लगेचच दरवाजा उघडला. समोर तो रिक्षाचालक होता. दरवाजा उघडताच त्याने प्रकाशला एक शिवी दिली. आता प्रकाशचे डोके फारच तापले होते. त्याने त्या रिक्षाचालकाच्या थोबाडीत एक चापट मारली आणि बेल वाजवून शिवी देण्याचे कारण विचारले. फाटलेली नोट दिल्याचा आरोप करून तो रिक्षाचालक प्रकाशला पुन्हा शिव्या देऊ लागला. आत्तापर्यंत त्याच्या शिव्यांचा आवाज प्रकाशच्या घरातल्यांनी सुद्धा ऐकला होता. त्यामुळे ती सर्व मंडळी घराबाहेर आली होती. तोपर्यंत या दोघांची चांगलीच मारामारी जुंपली होती. घरातील मंडळी आतल्या खोलीमध्ये असल्यामुळे त्यांना सुरुवातीला बाहेर घडणाऱ्या प्रकाराबद्दल माहित नव्हते. पण बाहेरून शिव्यांचा आवाज ऐकून आता ते सुद्धा घराबाहेर आले होते.

प्रकाशच्या वडिलांनी त्या दोघांची भांडणे वजा मारामारी सोडवली. त्यांनी प्रकाशला आतमध्ये जाण्यास सांगितले आणि रिक्षाचालकाची कशीबशी समजूत काढून त्याला तिथून घालवले.

. . .