नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : युद्धाची तयारी २

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी १   युद्धाची तयारी ३

प्रकाशचे अपहरण करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याने, नागलोकातील अनेक नाग, नागराजवर संतापले होते. त्यामुळे भविष्यात ते प्रकाशच्या बाजूने उभे राहू शकतील, अशी भीती नागराजला वाटत होती. त्याचबरोबर प्रकाशकडील अद्भूत शक्तींमुळे प्रभावित किंवा भयभीत झालेल्या नागांनी प्रकाशसमोर समर्पण केले, तर आपली ताकद अजूनच कमी होईल. ही भीती नागराजला सतावत होती. त्यामुळे तो आता चिंतेत दिसत होता, तितक्यात नागऋषींचे तिथे आगमन झाले.

"नागराज, जर त्या मनुष्याने नागलोकावर आक्रमण केले, तर तो आपल्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला काहीही करून हे युद्ध टाळायचे आहे." नागऋषी म्हणाले.

"परंतु, नागऋषी जर त्याने आपल्यावर आक्रमणच केले नाही तर?" नागराजने गंभीरपणे विचारले.

"मग तर... प्रश्नच मिटला." नागऋषी म्हणाले. "पण, मला असे वाटते की, त्याने आपल्यावर आक्रमण करण्याआधी आपण त्याला यमलोकी पोहोचवावे." (नागराज.)

"पुन्हा तीच चूक! ते सध्या तरी शक्य नाही नागराज. त्याच्याजवळील नागमणीमुळे तो अवैध्य बनला आहे." (नागऋषी)

"परंतु, त्याच्या शक्ती अजून त्याच्या नियंत्रणात नाहीत, हे आपण जाणतोच. किंबहुना त्याला त्याच्या शक्तीची अद्याप जाणीवच नाही; त्यामुळे आपल्याला क्षणाचाही विलंब न करता, त्याला संपवण्याचा मार्ग शोधला पाहिजे." (नागराज)

त्यावर नागऋषी मोठ्याने हसले आणि म्हणाले, "नागराज राजाने चौकस असावे. त्याचे लक्ष सर्वत्र असले पाहिजे."

"म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?" नागराजने चिडून विचारले.

"म्हणजे, तुझ्या विश्वसनीय प्रधान ‘नागतपस्वींनी’ त्या मनुष्याच्या नागशक्ती जागृत करण्यासाठी पृथ्वीवर केव्हाच प्रस्थान केले आहे." (नागऋषी)

"काय बोलता आहात आपण?" नागराज आता पूर्णपणे भयभीत झाला होता.

"होय, हे सत्य आहे. इतकेच नव्हे, तर त्याच्या जन्माच्या वेळी सुद्धा त्या नागतपस्वींनी पृथ्वीलोकात जाऊन त्या अर्धनागमनुष्याच्या सर्व नागशक्तींना बंदिस्त करून ठेवले होते. त्यामुळेच आपल्याला इतकी वर्षे त्याची उर्जा नागलोकात जाणवली नाही. आणि म्हणूनच तो आपल्यापासून सुरक्षितही राहू शकला." (नागऋषी)

"म्हणजे नागतपस्वींनी आपल्याशी घात केला आहे तर... त्यांना या सर्व गोष्टींची किंमत मोजावी लागेल. आम्ही त्यांना मृत्यूदंड देऊ." नागराज संतापाने उदगारला.
. . .