नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : पुनर्जन्म ३

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

पुनर्जन्म २   विकासाची रहस्ये १

रात्री घडलेल्या प्रसंगानंतर, आपला पिता 'प्रकाश' हा कोणी सर्वसामान्य मनुष्य नाही . ही गोष्ट विक्षरच्या लक्षात आली होती. स्मशानातील तांत्रिकाला तो आधीपासून ओळखत होता. इतकेच नव्हे तर आपल्या पित्याचा आणि त्याचा पूर्वजन्मापासून काहीतरी संबंध होता. हे त्या दोघांच्या संभाषणावरुन अगदी स्पष्ट झाले होते. प्रकाशने भुत-प्रेत आणि त्यांचा अधिपती असलेल्या वेताळालाही आपल्या समोर अगदी सहज नमवले होते. यासर्व गोष्टी त्याला घरी आल्यावरही सारख्या-सारख्या आठवत होत्या. त्यामुळे त्या घटनेचा विचार करुन-करुन जणू आता त्याचे मस्तक फुटायचीच वेळ आली होती. आपला पिता नक्की कोण असावा? हाच प्रश्न सतत त्याच्या मनामध्ये घर करत होता. शेवटी न राहून त्याने सकाळी प्रकाशकडे त्याबद्दल विचारणा केली. प्रकाशला त्याला सत्य सांगायचे नव्हते. पण विक्षर जणू हट्टालाच पेटला होता. काल  रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल तुझ्या आईला काही सांगायचे नाही.'' असे त्याने विक्षरला बजावून सांगितले होते. विक्षरने अद्याप प्रकाशला दिलेला शब्द पाळला होता. पण तरीही कालच्या रात्री घडलेला सर्व प्रकार त्याच्यासाठी चिंतेची बाब असल्यामुळे, तो भरपूर अस्वस्थ झाला होता. आता काहीही झाले तरी सत्य काय? ते जाणून घ्यायचेच हे त्याने आपल्या मनाशी ठरवलेले होते. त्याच्या मनाची अवस्था विक्षरला पहावत नव्हती. म्हणून नाईलाजाने प्रकाशने त्याला हे रहस्य सांगण्याचे मान्य केले.

"विक्षर तुला काय आणि इतर सामान्य मनुष्याला काय...या विश्वाविषयीच्या बऱ्याचशा रहस्यमय गोष्टी माहित नसतात...त्या माहिती असूच शकत नाहीत. अशीच स्थिती इथे कायम निर्माण झालेली असते. आणि या पुढेही ती कायम राहणार आहे. ह्या मनुष्याच्या जगात अशी कितीतरी रहस्ये आहेत जी त्याला कधीच कळू शकणार नाहीत. त्यामुळे सामान्य मनुष्याला ही रहस्ये समजून घेताच येत नाहीत. मनुष्याचे हे दुर्दैव आहे की, ह्या जगात तो जन्माला येतो उघड्या डोळ्यांना जे जग दिसते फक्त त्यावार विश्वास ठेवतो आणि एक दिवस ह्याच अर्धवट ज्ञानासोबत हे जग सोडूनही जातो. त्यामुळे ह्या जगातील बऱ्याचशा रहस्यमय गोष्टींचे त्याला ज्ञान नसते."

प्रकाशला नेमके काय बोलायचे आहे हे विक्षरच्या लक्षात येत नव्हते. परंतु आपल्या पित्याला ह्या विश्वातील बरीचशी अद्भूत अशी रहस्ये माहिती असणार या गोष्टीवर आता विक्षरचा पूर्णपणे विश्वास बसला होता.

"विक्षर, आता मी तुला ज्या काही गोष्टी सांगणार आहे, त्यावर तुझा विश्वास बसेल हे मला माहित नाही. पण मी जे काही सांगेन ते सत्यच असणार आहे यात शंका नाही..." एवढे बोलून त्याने विक्षरसमोर ह्या जगातील रहस्यांचा उलगडा केला.
. . .