नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : युद्धाची तयारी ५

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी ४   युद्धाची तयारी ६

संध्याकाळची वेळ होती. प्रकाश बंगल्याच्या खिडकीतून बाहेर बघत कसलातरी विचार करत होता. गेल्या चार दिवसांपासून तो मोहनबरोबर त्याच्या बंगल्यात राहत होता. त्याच्या अपहरणाच्या दिवसापासूनच त्याला त्याच्या आयुष्यातील रहस्ये समजू लागली होती. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये त्याच्या मनावर भरपूर आघात झाले होते. नागांनी त्याचे अपहरण करूनं त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. इतकी वर्षे त्याला आईची माया देणाऱ्या लताने त्याच्या अपहरणाचा ताण घेतल्याने तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ही गोष्ट त्याच्या मनाला सतत टोचत होती. त्यातच इतकी वर्षे सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या प्रकाशला, आता अचानक आपण नाग असल्याचेही समजले होते. त्यामुळे हे सर्व आपल्या जीवनात नक्की काय सुरु आहे, हे त्याला समजत नव्हते. त्याच्या आयुष्यात अचानकपणे सुरु झालेल्या अशाप्रकारच्या विचित्र घटनाक्रमामुळे त्याला सुरुवातीला भयंकर मनःस्ताप झाला होता. पण आता तो त्यातून थोडा सावरला होता. त्याच्या जीवनात जो काही विचित्र घटनाक्रम सुरु झाला तो बदलणे त्याच्या हातात नाही, हे सत्य त्याला ठाऊक होते.

नागतपस्वींनी त्याच्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये बंदिस्त असलेल्या शक्तींना जागृत करताना, त्याच्या शरीरातील सप्तचक्रेही आपोआप जागृत झाली होती. त्याचे सहस्त्रार चक्र जागृत झाल्यापासून त्याला अनेक दिव्य अनुभुती होऊ लागल्या होत्या. त्याच्या मनातील सर्व चिंता मिटून आपोआपच त्याला परमानंदाची प्राप्ती झाली होती. सहस्त्रार चक्र जागृत होताच, एका सामान्य मुलाचे रुपांतर एका योग्यामध्ये झाले होते. तो आता जगाच्या मोह-मायेपासून फारच दूर आला होता. आता त्याच्या वागण्या-बोलण्यात खूपच फरक पडला होता. त्याला त्याच्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळू लागली. त्यामुळे आता कुठलीही गोष्ट याला समस्या वाटणार नव्हती. आता त्याला कुणाशीच फारसे काही बोलण्याची गरज नव्हती. कोणी काही बोलण्याच्या आतच तो त्यांच्या मनातील भावना आता ओळखू शकत होता. त्यामुळे आता तो पूर्वीपेक्षा फारच शांत स्वभावाचा बनला होता.
. . .