नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : नागांची रहस्ये ३

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

नागांची रहस्ये २   युद्धाची तयारी १

"नागांना पाताळातून पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याची जबाबदारी ही कराराच्या वेळी नागांचा राजा असलेल्या अनंता नागाची होती. आतापर्यंत अनंताच्या पूर्वजांपैकी अनेक नाग, नागांचे राजे होऊन गेले होते. त्यामुळे वंशपरंपरेनुसार अनंताला राजपद मिळाले होते. काही वर्षे नागांवर उत्तम राज्य केल्यानंतर अनंतामध्ये आणि त्याच्या भावंडामध्ये राज्यपदावरून भांडणे होऊ लागली. अनंतामुळेच पृथ्वीवरील नागांचे अस्तित्व संपुष्टात आले असे अनेक नागांचे मत होते. अनंताने कुणालाही विश्वासात न घेता मनुष्याच्या शब्दांवर भुलून सत्तेच्या लालसेपोटी मनुष्याला दिलेले वचन अनेक नागांना मान्य नव्हते. त्यामुळे अनंताने मनुष्याशी केलेला करार अवैध ठरवून अनेक नागांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले."

"त्यावेळी नागांमधील निर्माण झालेला असंतोष, मतभेद आणि भांडणे नागतपस्वींना पहावत नव्हती. जर नाग आपापसात असेच भांडत बसले तर, पाताळलोकातील नागांचे अस्तित्व धोक्यात येईल, याची नागतपस्वींना खात्री होती. म्हणूनच त्यांनी नागलोकांतील हा वाद मिटविण्याकरीता वादाचे मुळ कारण असलेल्या अनंताला शिक्षा म्हणून नागलोक सोडून पृथ्वीवर जाण्याचे आदेश दिले. नागतपस्वी अत्यंत विद्वान नाग असून, त्यांनी आपल्या तपस्येतून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे त्यांना नागतपस्वी याच नावाने ओळखले जाई. ते, सर्व नाग प्रजातींसाठी पुजनीय होते. त्यामुळे त्यांची आज्ञा अनंताला मान्य करावीच लागली. अनंताने मनुष्याशी केलेला करार त्यांच्याही बुद्धीला पटला नव्हता. पण स्वभावाने शांतीप्रिय असलेल्या नागतपस्वींनी त्या कराराच्या वेळी, राजाची इच्छा निमुटपणे मान्य केली होती. म्हणूनच इतकी वर्षे पृथ्वीवर न जाण्याच्या निर्णयाला सर्व नागांनी पाठिंबा दिला होता. परंतु तरीही काही नागांनी त्या कराराची पर्वा न करता पृथ्वीवर गुप्तपणे प्रवेश केला होता."

"पाताळात राहणारे सर्वच नाग अलौकिक शक्तीचे स्वामी असल्यामुळे, त्यांच्यातील अनेकांकडे अदृष्य होणे, हवेत उडून आकाशात संचार करणे तसेच इच्छेप्रमाणे कुठलेही रुप घेणे यांसारख्या कित्येक अद्भूत शक्ती होत्या. त्यामुळे ते नाग पृथ्वीवर सहजपणे कुणालाही न दिसता गुप्तपणे वास्त्यव्य करू शकत होते."

"पाताळातील नागलोक आणि पृथ्वीलोक यांच्यामधील गुप्तमार्ग काही प्रमुख नाग सोडले तर इतर कुणालाही माहित नव्हता. या गुप्तमार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वी आणि नागलोक यांच्यामधील लाखो योजनांचे अंतर, या गुप्तमार्गामुळे काहीच योजनांचे होत असे. त्यामुळे या गुप्तमार्गामुळे पृथ्वीवर अल्पावधीत जाणे सहज शक्य होते. पण ज्यावेळी नाग पाताळात आले त्याचवेळी तो गुप्त मार्ग अनंताने गुप्तमंत्राने बंद करुन टाकला होता. दोन लोकांना जोडणारा मार्ग दिव्य मंत्राच्या सहाय्याने बंद केल्याने, तो मंत्रशक्तीचे ज्ञान असल्याखेरीज सामान्य नागांच्या दृष्टीसही पडणार नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागांच्या मनातुन पृथ्वीवर परत जाण्याचे विचार कायमचे नष्ट झाले होते. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीपासून शेकडो योजनांचे अंतर पार केल्यावर सप्तलोकांची सुरुवात होते ते सप्तलोक म्हणजे अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, आणि पाताळ. यातील प्रत्येक लोक दहा हजार योजनांच्या अंतरावर आहेत. म्हणजेच पृथ्वीपासून पाताळलोक लाखो योजनांच्या अंतरावर आहे. तोच हा नागलोक. साहजिकच पृथ्वीपासून लाखो योजना दूर असलेल्या नागलोकातील सामान्य नागांचा दिव्यमंत्रशक्तींच्या अभावी पृथ्वीशी काहीच संबंध राहिला नव्हता. त्यामुळे अनेक नागांकडून पृथ्वीवर न परतण्याच्या वचनाचे आपोआपच पालन होत होते."

"पृथ्वीलोक आणि नागलोक यांना जोडणारा गुप्त मार्ग म्हणजे ‘तरणा’ ही नदी होती. प्रचंड मोठे खोरे असलेली ही नदी पार करुन पृथ्वीवर प्रवेश करणे, हे मंत्रशक्तीच्या अभावी सर्वसामान्य नागांसाठी अशक्य होते. त्यामुळे फक्त दिव्य मंत्रशक्ती असलेल्या मोजक्याच नागांना ती नदी पार करुन पृथ्वीवर परत प्रवेश करणे शक्य होते."

आता मी तुला नागलोकाची माहिती सांगतो.....

"नागलोक हा भरपूर मोठा लोक आहे. एक काळ असा होता, जेव्हा तिथले जीवन पृथ्वीवरील मनुष्याच्या जीवनापेक्षा लाख पटींनी चांगले होते. जिथे हजारो नगरे होती. प्रत्येक नगरांमध्ये वास्तव्यासाठी मोठ-मोठे महाल होते. देवी देवतांची भव्य दिव्य मंदिरे होती. कोणालाही कशाचीच कमी नव्हती. त्याकाळी प्रत्येक नाग सुखी आणि समाधानी होता. तिथली जिवनपद्धती पृथ्वीवरील मानवाच्या जीवनपद्धतीपेक्षा कैकपटींनी सुखदायक आणि आरामदायक होती. त्याकाळचे राजे अत्यंत पराक्रमी होते. जे आज आम्हांला पुजनीय आहेत. त्या काळच्या नागलोकासमोर स्वर्ग सुद्धा फिका वाटायचा. जिथे कित्येक नद्या अमृतापेक्षाही मधुर जल देणाऱ्या होत्या. जिथली झाडे अशी दिव्य फळे द्यायची की, त्यांच्या सेवनाने एक मास भुकच लागत नसे. जिथे अनेक दिव्य गाई होत्या; ज्यांच्या दुधावरच नागांची शुधा शांत होत असे. त्यावेळी नागलोकात राहणारे नाग लाखो वर्षे निरोगी जीवन जगत होते. नागलोकी सुर्याची किरणे पोहचत नाहीत. पण तरीही नागांच्या शरीरावरील रत्नजडीत दिव्य अलंकारामुळे तिथे मंद प्रकाश असतो."

"लाखो वर्षापूर्वी जेव्हा शेषनाग, वासुकीनाग यांसारखे नाग आपले राजे होते, तेव्हा मात्र त्यांच्या मस्तकावरील नागमणींच्या तेजाने नागलोक सदैव प्रकाशमय असे; पण आता त्या सर्व गोष्टी फक्त दंतकथा म्हणून आठवल्या जातात." हे ऐकताच प्रकाशला नागलोकांत घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. जेव्हा त्याने आपल्या मस्तकावरील नागमणीला स्पर्श केला, तेव्हा तिथे सर्वत्र भरपूर प्रकाश पसरल्याचे त्याला आठवले.

".... पण आता, नागलोकाची स्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता नागांमध्ये आपापसात मतभेद होऊ लागले आहेत. ते सुद्धा मनुष्याप्रमाणेच स्वार्थासाठी, सत्तेसाठी, ऐश्वर्यासाठी भांडू लागले आहेत. नागांमध्ये आजवर शेषनाग, वासुकीनाग, तक्षक नाग असे कितीतरी महान राजे होऊन गेले. तुझे आजोबा अनंता, सुद्धा एक कुशल राजे होते. पण कुशल राजकारणी नव्हते. त्यामुळेच कदाचित त्यांना आपले राजपद फार काळ टिकवता आले नाही. त्यावेळी नागलोकात भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. अनंता आणि त्याच्या भावंडामध्येच राजपदासाठी राजकारण सुरु झाले त्यावेळी कुटुंबातील भांडणे, संपूर्ण नागलोकातील संघर्षाचे कारण बनले असते. राजपरिवारातील भांडणे आणि मतभेदांचा प्रभाव सामान्य नाग प्रजेवर होऊ लागला होता. त्यामुळे अशाप्रकारच्या कौटुंबिक भांडणांनी संपूर्ण नाग प्रजातीमधील संघर्षाचे रुप घेऊ नये, याकरिताच मी अनंताला आपल्या राजपदाचा त्याग करून, पृथ्वीवर जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागलोकातील संघर्षमय परिस्थिती टळून सर्वत्र शांतता पसरली."

"पूर्वीच्या इच्छाधारी नागांमध्ये आणि आताच्या इच्छाधारी नागांमध्ये फार मोठा फरक आहे. पूर्वी इच्छाधारी या नावाप्रमाणेच नागांच्या सर्व इच्छा पूर्ण होत होत्या. पण आता मात्र तसे घडणे शक्य नाही. पूर्वी एकाच नागाकडे असंख्य शक्ती असायच्या.पण आता मात्र नागांच्या बऱ्याचशा शक्ती क्षीण झाल्या आहेत. नागांकडील बऱ्याचशा प्राचिन विद्या लोप पावल्या आहेत. आता प्रत्येकाकडे भिन्न शक्ती आहेत. प्रत्येक नाग विविध शक्तींची उपासना करुन आपल्यातील विशिष्ट शक्तींना महत्त्व देऊ लागला आहे. पण पूर्वी मात्र असे नव्हते. पूर्वी सर्व नाग कमी-अधिक फरकाने समान होते. आता नागांमध्ये गट पडू लागले आहेत. समान शक्ती असलेले नाग आपापला समूह करुन राहू लागले आहेत. त्यामुळे नागांमध्ये आता हजारो जाती निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक जातीमधील नाग त्याच्या जातीचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे आपापसातील वाद अधिकच वाढतात. पूर्वी एक असणारे नाग आता एकमेकांशीच स्पर्धा करू लागले आहेत. हल्लीच्या नागांना सत्तेची आणि ऐश्वर्याची लालसा स्वस्थ बसून देत नाही. त्यामुळे आता अर्ध्याधिक नाग एकमेकांचे शत्रु बनले आहेत. मला वाटते त्यावेळी जर मी तुझ्या आजोबांना पृथ्वीवर पाठवले नसते,तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती. त्यांच्या जाण्यानंतर राजपदावर असलेल्या नागराजने स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक ह्या सर्व परिस्थिती निर्माण केल्या. आपापसात भांडणारे नाग जर एकत्र आले, तर त्याच्या हातातील सत्ता दुसऱ्या नागांच्या हातात जाईल. म्हणूनच त्याने हे सर्व घडवून आणले. त्यामुळे मी सुद्धा ह्या सर्व गोष्टींसाठी तितकाच जबाबदार आहे."

"नाही हे सत्य नाही, त्यावेळी जे काही घडले त्यात तुमची काहीच चुक नव्हती. त्यावेळची परिस्थिती टाळण्यासाठी तेच योग्य होते." अनंता म्हणाला.

"हो, पण ती परिस्थिती टाळण्याच्या नादात आजची स्थिती निर्माण झाली, हे देखील एक सत्य आहे." नागतपस्वी म्हणाले.

"नागतपस्वी, आता नागराज काय करेल? असे वाटते तुम्हाला?" अनंताने विचारले.

"इथे असल्यामुळे त्याची सध्या मलाही कल्पना नाही. पण नागराज आता शांत बसणार नाही. तो नक्कीच काहीतरी करण्याच्या तयारीत असेल. कदाचित तो नागमणी प्राप्त करण्याच्या तयारीतही असेल.

"म्हणजे?" मोहनने आश्चर्यचकित होऊन विचारले.

"मोहन, प्रत्येक नाग, नागमणी तयार करू शकतो. कदाचित हे तुला माहित नसावे." नागतपस्वी म्हणाले.

"हो पण त्यामुळे नागांचा जीवसुद्धा जाऊ शकतो." अनंता म्हणाला.

आश्चर्यचकीत झालेला प्रकाश सर्व शांतपणे ऐकत होता. पण मोहन मात्र थोडा अस्वस्थ दिसत होता.

"नागतपस्वी तुम्ही काय बोलत आहात हे मला समजत नाहीये, कृपा करुन मला थोडे स्पष्ट करून सांगा." मोहन म्हणाला.

"जसे मनुष्याच्या शरीरात कुंडलिनी शक्ती वास करते. पण फक्त  ०.१% मनुष्यांनाच ती दिव्य शक्ती जागृत करता येते. बरे जरी एखाद्या मनुष्याने अथक प्रयत्नाने जर आपली कुंडलिनी शक्ती जागृत केली, तरी त्या शक्तीला नियंत्रित करणे त्याला जमत नाही. अशा अनियंत्रित शक्तीमुळे अनेक साधकांचा मृत्यु होतो. त्यामुळे मनुष्य सहसा ती अद्भूत शक्ती जागृत करण्याच्या फंदातच पडत नाही. आणि तसे पण ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान फार कमी मनुष्यांनाच असते. त्याचप्रमाणे सर्व नागांच्या अंगी नागमणी तयार करण्याची शक्ती असते. त्यासाठी त्यांना आपल्या शरीरातील सर्व विष एकाच ठिकाणी थुंकून साठवायचे असते. ज्यावेळी ते विष गोठते, त्यावेळी त्याचा नागमणी तयार होतो. पण ह्या प्रक्रियेमध्ये जर त्याच्या शरीरात थोडे जरी विष शिल्लक राहिले, तर पूर्णतेच्या अभावामुळे त्यापासून नागमणी तयार होऊ शकत नाही. परंतू एकाच वेळी  इतके विष शरीराबाहेर काढल्याने नागांची शक्ती खुपच क्षिण होते. अनेकदा ह्या सर्व खटाटोपामध्येच त्यांची सर्व उर्जा संपून जाते आणि त्यांचा आपोआपच मृत्यू होतो. पण जर एखाद्या नागाने आपल्या शरीरातील सर्व विष शरीराबाहेर काढण्यात यश मिळवले, तर त्याच्या साठलेल्या विषाचा नागमणी तयार होतो. आणि मग त्या नागमणीच्या दिव्य शक्तींमुळे त्या नागसाधकाने नागमणी प्राप्त करण्यासाठी गमावलेले विष आणि त्याच्या शरीरातील खर्च झालेली सर्व उर्जा त्याला परत मिळते आणि त्याचबरोबर नागमणीच्या अद्भूत शक्तीसुद्धा त्याला प्राप्त होतात."

"याचाच अर्थ नागमणी तयार करण्यासाठी शरीरातील विषाचा प्रत्येक थेंब महत्वाचा असतो." प्रकाश म्हणाला.

"होय, परंतु शरीरातून सर्व विष बाहेर काढणे हे काही सोपे काम नाही. बरं, जरी एखादा नाग आपल्या शरीरातील सर्व विष बाहेर काढण्यात यशस्वी झाला, तरी ते विष लगेचच गोठवावे लागते. कारण जर ते वायूच्या संपर्कात फार काळ राहिले तर ते निरुपयोगी ठरते."

"मग ते विष त्वरित गोठविण्याचे कार्य कसे काय शक्य होते?" मोहनने विचारले.

"त्यासाठी मंत्र सिद्धी असावी लागते. नाहीतर सर्वच व्यर्थ ठरते." इतके बोलून नागतपस्वी शांत झाले. नागतपस्वींचे बोलणे संपल्यावर प्रकाशने स्मित हास्य केले. त्याला एकट्यालाच असे स्मित करताना पाहून मोहन आणि अंताला थोडे आश्चर्य वाटले होते. पण नागतपस्वींना त्यामागचे कारण माहित होते. त्याला  जन्मतःच दिव्य नागमणी प्राप्त झाल्यामुळे तो खूपच भाग्यवान असल्याचे त्याने आता जाणले होते.
. . .