नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : युद्धाची तयारी ३

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी २   युद्धाची तयारी ४

नागतपस्वींनी प्रकाशच्या सुरक्षेसाठी, त्याला वेळोवेळी गुप्तपणे केलेल्या सहाय्याबद्दल नागराजला समजल्याने नागराज खूप संतापला होता. नागतपस्वींनी मनुष्य हितासाठी अशाप्रकारे कार्य करावे ही गोष्ट तो खपवून घेऊ शकत नव्हता. त्यामुळे नागतपस्वींना त्यांच्या ह्या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांना मृत्युदंड देण्याचा विचार त्याने आपल्या मनाशी पक्का केला होता. परंतु त्याला आपला हा विचार सत्यात उतरवण्यासाठी नागतपस्वी पृथ्वीलोकातून नागलोकी परतण्याची वाट पहावी लागणार होती.

नागलोकात नागतपस्वी दिसताक्षणी त्यांना बंदी बनवून माझ्यासमोर हजार करावे असा हुकूम नागराजने आपल्या सेवकांना दिला होता. त्यामुळे पृथ्वीलोकातून गाफील अवस्थेत परतलेल्या नागतपस्वींचे नागलोकी आगमन होताच बल्ल आणि मल्लने त्यांना बंदी बनवले आणि नागराजसमोर तत्काळ हजर केले. त्यावेळी नागराज आणि नागतपस्वींचे दीर्घ संभाषण झाले. नागतपस्वींनी त्याला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्याचा नागराजवर काहीच परिणाम झाला नव्हता. नागतपस्वींनी अशाप्रकारे गुप्तपणे अनंताला आणि त्याच्या नातवाला सहाय्य करणे, हे नागराजला मान्य नव्हते. म्हणून त्याने नागतपस्वींना डसून त्यांचा जीव घेतला. पृथ्वीवरच्या प्रदुषित वातावरणात नागतपस्वींच्या शरीरातील उर्जा असंतुलित झाल्या होत्या. त्याशिवाय नागलोक आणि पृथ्वीलोक यांच्यामधील नदी ओलांडून जाण्यासाठी केलेल्या प्रवासात, त्यांच्या अनेक शक्ती खर्ची पडल्या होत्या. वृद्धत्वामुळे त्यांच्या शरीरावर प्रवासाचा विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना त्या शक्ती परत मिळविण्यासाठी बराच काळ जावा लागणार होता. आपल्या शक्तीअभावी त्यांना आपल्या दिव्य दृष्टीचा वापर करून नागलोकी घडलेल्या घटनांबद्दल जाणून घेणेही शक्य नव्हते. अशा अवस्थेत नागराजने त्यांना पकडले होते, तेव्हा त्यांच्याकडे त्याचा प्रतिकार करण्याचीही शक्ती उरली नव्हती. म्हणून नागराजने त्यांना डसताक्षणी त्यांचा मृत्यू झाला. नागतपस्वींच्या मृत्युनंतर त्यांच्या जागी नागऋषींची मुख्य प्रधान म्हणून नेमणूक केली गेली.
. . .