नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : युद्धाची तयारी ७

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी ६   युद्धाची तयारी ८

अनंता नागलोकात येत आहे, ही बातमी नागराजला नागऋषींकडून समजली होती. पण त्याला अनंताची फारशी भीती नव्हती. तो स्वतः आणि त्याचे सैन्य अनंतासारख्या नागांचा सामना करण्यासाठी सक्षम होते. पण त्याला मारल्यावर, त्याचा नातू प्रकाश नागलोकावर आक्रमण करेल, या गोष्टीची मात्र त्याला फार भीती वाटत होती.

आत्तापर्यंत त्याने आपल्या निवडक नागसैनिकांना नागऋषींच्या मार्गदर्शनाखाली नागमणी निर्माण करण्याचे आदेश दिले होते. बरीच वर्षे कठोर साधना करूनही नागऋषींना नागमणी निर्माण करता आला नव्हता. पण तो निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्यांना ठाऊक होते. नागराज भीतीपोटी, अविचाराने मुर्खासारखे वागत आहे, याची नागऋषींना जाणीव होती. पण तरीही राजाच्या इच्छेचा मान राखून त्यांनी निवडक नागांना, नागमणी निर्माण करण्याचे तंत्र शिकवणे आरंभ केले.

नागमणी निर्माण करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि कठीण होती. त्यामुळे कोणत्याही नागाला त्याचे तंत्र शिकवले, तरी ती शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी आणि विकसित  करण्यासाठी त्यांच्याही अंगी तेवढीच योग्यता व ती शक्ती धारण करण्याची क्षमता असणे आवश्यक होते. तंत्र शिकवल्याने नागांमध्ये त्या शक्तीला समजून घेण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते; पण नागमणी निर्माण करण्यासाठी मात्र नागसाधकाच्या अंगी ती महाशक्ती निर्माण करण्याची पात्रता असणेच सर्वात महत्वाचे होते. त्यानंतर निरंतर प्रयत्नातून नागसाधक, नागमणी प्राप्त करण्याचा मार्गावर  पुढे अग्रेसर होऊ शकतो. हे सत्य नागराज आणि नागऋषींना चांगलेच माहित होते. त्याचप्रमाणे या सर्व दिव्य गोष्टी घडवून आणण्यासाठी सिद्ध आणि सामर्थ्यवान गुरूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची होती. पण नागऋषींना स्वतःच्या सामर्थ्याचा भरपूर अहंकार होता. त्यामुळे त्यांनी कसलाही विचार न करता हे महाकठीण कार्य घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.
. . .