नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : युद्धाची तयारी ८

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

युद्धाची तयारी ७   मोहनचे रहस्य

नागतपस्वींची हत्या होऊन बराच काळ उलटून गेला होता. त्यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अनंता नाग नागलोकी येत असल्याचे नागराजला नागऋषींकडून केव्हाच समजले होते. परंतु अनंता अद्याप नागलोकी पोहोचला नव्हता. त्याला नागलोकी येण्यासाठी इतका उशीर झाल्याने त्याला संपवण्याच्या तयारीत असलेला नागराज अस्वस्थ झाला होता. भविष्यात उदभवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, त्याने नागऋषींना नागमणी निर्माण करण्याचे तंत्र, इतर नागांना शिकवण्याची आज्ञा दिली होती. नागतपस्वीनंतर सर्वात अनुभवी नाग म्हणून नागराजला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होती. पण आत्तापर्यंत नागमणी प्राप्त करण्याच्या इच्छेने भरपूर नागांचा जीव गेला होता. तरीही नागराजने आपल्या स्वार्थासाठी हा सर्व जीवघेणा प्रकार सुरूच ठेवला होता. नागऋषींवर हे महाअवघड कार्य सोपवल्यापासून, त्यांनीही आपल्या परीने अथक परिश्रम घेतले होते. पण तरीही त्यांच्या शिष्यांनाच काय, पण त्यांना स्वतःला देखील अद्याप नागमणी प्राप्त करता आला नव्हता. नागऋषींचे अपयश बघून नागराज त्यांच्यावर खूप संतापला होता. त्यामुळे नागतपस्वींनी आपले अध्यापनाचे कार्य सतत सुरूच ठेवले होते.

नागराजने आपला संपूर्ण महल ह्या कार्यासाठी नागऋषींकडे सोपवला होता. दररोज हजारो नाग, नागमणी निर्माण करण्याचे तंत्र शिकण्यासाठी तिथे येऊ लागले. नागतपस्वी त्यांना कसलेही प्रशिक्षण देण्याआधी त्याची योग्यता तपासण्यासाठी, त्यांची एक परीक्षा घेत होते. त्या परीक्षेमध्ये  हजारो नागांपैकी चार-पाच नागच यशस्वी होत. त्यामुळे बाकीच्या नागांना निराश होऊन स्वगृही परतावे लागायचे. साहजिकच नागमणी निर्माण करणे, हा काही खेळ नव्हता, जो कोणीही सहज निर्माण करू शकला असता. इतक्या दिवसांत नागऋषींनी लाखो नागांमधून जवळपास कफ्त पाचशेच नाग, नागमणीच्या निर्माणाचे तंत्र शिकविण्यासाठी निवडले होते. त्या नागांना त्यांनी प्रशिक्षित करण्यासाठी राजमहालातच ठेवून घेतले होते. आता त्यांचा संपूर्ण वेळ ते आपल्या शिष्यांबरोबरच व्यतीत करत होते. पण अद्याप त्यांच्या पदरी निराशाच पडत आली होती. आत्तापर्यंत त्यांच्या शिष्यांपैकी अर्ध्याधिक नागांनी ती महाकठीण साधना करताना आपला जीव गमावला होता. पण तरीही त्याची चिंता न करता त्यांनी नागराजच्या आज्ञेनुसार आपले प्रशिक्षणाचे कार्य असेच सुरु ठेवले होते.

एखादा नाग जरी नागमणी निर्माण करण्याच्या कार्यात यशस्वी झाला, तर त्याला आपल्या दिव्य औषधाद्वारे संमोहित करून, त्याने धारण केलेला नागमणी त्याने धारण करण्याच्या आतच त्याच्याकडून तो हिरावून घ्यायचा, त्यासाठी प्रसंगी त्या नागाची हत्या देखील करायची, पण काहीही करून नागमणी प्राप्त करायचा. असा नागराजचा बेत होता. नागऋषी, नागराजच्या मनातील बेत ओळखून होते, पण गेली कित्येक वर्षे ते नागराजकडे आश्रीत होते. नागराजने त्यांच्यातील सामर्थ्य व क्षमता ओळखूनच त्यांना आपल्या दरबारी ठेवून घेतले होते. त्याच्या याच उपकाराच्या दबावाखाली त्यांनी आजवर नागराजचे सर्व आदेश मान्य केले होते. आणि पुढे ही ते तेच करणार होते...
. . .