नागमणी एक रहस्य
प्रसाद सुधीर शिर्के Updated: 15 April 2021 07:30 IST

नागमणी एक रहस्य : अपहरण ३

नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.

अपहरण २   अपहरण ४

प्रकाश हा वसंतचा दत्तक घेतलेला मुलगा होता. त्याच्या लहानपणीच त्याची आई वारली म्हणून त्याच्या वडीलांनी काही काळाने दुसरे लग्न केले. पण त्याची सावत्र आई त्याला, आपल्या मुलाप्रमाणे सांभाळण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्याच्या वडीलांची व तिची रोजचं भांडणे होऊ लागली. आणि मग शेवटी प्रकाशच्या वडीलांनी नाईलाजाने त्याला कायदेशीररित्या वसंतला दत्तक देऊन टाकले. ही सर्व माहिती वसंतने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी आपल्या पद्धतीने प्रकाशची सर्व माहिती गोळा केली. आणि त्या माहितीच्या आधारावर ते प्रकाशचा शोध घेऊ लागले.

प्रकाशचा शोध सुरु असतानाच, पोलिसांना खासदार मोहनरावांचा फोन आला. प्रकाश बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या प्रकरणाची, खासदार साहेबांनी दखल घेतली. खासदार साहेबांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यामागचे कारण पोलिसांना अद्याप समजू शकले नव्हते. पण खासदारांनी या प्रकरणात लक्ष दिले म्हटल्यावर पोलिस सावध झाले होते. आणि त्यामुळे  ते काळजीपूर्वक प्रकाशचा तपास करू लागले.

मोहनराव हे शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तीपैकी एक होते. मोहनराव मोठे उद्योगपती होते. त्याशिवाय ते उत्तम राजकारणी सुद्धा होते. ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते आणि आता, तर ते खासदार पदी विराजमान होते.

प्रकाशच्या अशा प्रकारच्या अचानक गायब होण्यामुळे ते अस्वस्थ होते. ह्या प्रकरणाबद्दल त्यांना कळताच क्षणी त्यांनी, पोलिसांनी प्रकाशच्या प्रकरणात दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली होती.
. . .